रत्नागिरी: कसोप-बनवाडी धरण परिसरात आंघोळीवर बंदी; नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

Gramin Varta
215 Views

रत्नागिरी : तालुक्यातील कसोप-बनवाडी येथील धरण परिसरात नागरिकांची सुरक्षा आणि स्वच्छतेच्या कारणास्तव आंघोळीवर ग्रामपंचायतीने पूर्णपणे बंदी घातली असून, तसे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवून अनेक तरुण-तरुणी आजही धरणात आंघोळीसाठी येत असल्याचे समोर आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकाराला विरोध दर्शवल्यानंतर काही पर्यटकांकडून त्यांच्याशी वाद घालण्याचे प्रकार घडले, ज्यामुळे ग्रामस्थांनी अखेर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली होती.

तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. धरण परिसरात आंघोळीसाठी येणाऱ्यांवर आता पोलीस प्रशासनाकडून कडक लक्ष ठेवले जाणार असून, यापुढे बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *