रत्नागिरी: गणपतीपुळे-फुणगूसमार्गे शास्त्रीपूलकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. चिपळूणमार्गे गणपतीपुळेकडे येण्यासाठी फुणगूस, जाकादेवी, चाफे आणि शास्त्रीपूल हा अतिशय जवळचा मार्ग असल्याने पर्यटकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत, तर अनेकदा रिक्षाही चिखलात अडकून पडत असल्याचे चित्र आहे.
या धोकादायक रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून पर्यटकांचे आणि स्थानिक ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. या मार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याने या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
