वाहन चालकांनी मानले ग्रामीण वार्ताचे आभार
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या संथ आणि ढिसाळ कामाचा फटका आता वाहनचालकांना सहन करावा लागत असून, उक्षी पुलाजवळ डोंगरावरून दरड कोसळल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. रस्त्यावर साचलेली माती आणि चिखलामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत होता. मात्र, या गंभीर प्रश्नाला ‘ग्रामीण वार्ता’ने वाचा फोडल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, तातडीने कार्यवाही करत रस्ता मोकळा करण्यात आला आहे.
या परिसरात सुरू असलेले महामार्गाच्या संरक्षण भिंतीचे काम अर्धवट असल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत होते. योग्य निचरा व्यवस्था नसल्यामुळे दरडीची माती रस्त्यावर येऊन रस्ता अत्यंत निसरडा झाला होता. यामुळे वाहनचालकांचे, विशेषतः दुचाकीस्वारांचे प्रचंड हाल होत होते आणि अपघातांची शक्यताही वाढली होती. ‘ग्रामीण वार्ता’ने या धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधताच, यंत्रणेने तात्काळ पावले उचलत रस्त्यावरील माती व चिखल हटवण्यास सुरुवात केली. वेळेत झालेल्या या कार्यवाहीमुळे मोठा धोका टळला असून, वाहनचालकांनी ‘ग्रामीण वार्ता’च्या या जनहितार्थ भूमिकेचे कौतुक केले आहे. या मार्गावरील पावसाळी धोके लक्षात घेता, भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.
