रत्नागिरी : मृग नक्षत्राचा अर्धा कालावधी संपत आला असतानाही मान्सूनने पाठ फिरवल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या किरकोळ पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेली कोवळी भात रोपे आता जमिनीतील ओलावा संपल्यामुळे सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत असून पीक वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
जून महिन्याचा अर्धा कालावधी उलटून गेला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दरवर्षी या काळात शेतांमध्ये चिखल तयार करून लावणीच्या तयारीला वेग आलेला असतो. मात्र यंदा कडक उन्हामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या असून नांगरणी करताना धुरळा उडत असल्याचे चित्र अनेक भागांत दिसून येत आहे. पाण्याअभावी पुढील मशागतीची कामे आणि लावणीची तयारीही अनेक ठिकाणी ठप्प झाली आहे.
उगवलेली भात रोपे वाचवण्यासाठी काही शेतकरी उपलब्ध जलस्रोतांचा आधार घेत कृत्रिम सिंचनाचा पर्याय वापरत आहेत. विहिरी, ओहोळ आणि इतर लहान जलस्रोत आटत चालल्याने अनेकांना दूरवरून पाईपलाईन टाकून किंवा डिझेल पंपाच्या सहाय्याने पाणी शेतात पोहोचवावे लागत आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या शेती खर्चात आणखी भर पडत असून शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत आहे.
कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस न झाल्यास भाताची कोवळी रोपे मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते. बियाणे, खते आणि मजुरीवर झालेला खर्च वाया जाण्याबरोबरच नव्याने पेरणी करण्यासाठी अतिरिक्त खर्च उचलण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
रत्नागिरी शहर परिसरापासून ग्रामीण आणि डोंगराळ भागांपर्यंत सध्या चिंतेचे वातावरण असून सर्वांचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात ऊन आणि ढगांचा खेळ सुरूच आहे. त्यामुळे संपूर्ण खरीप हंगामाचे भवितव्य आता वरुणराजाच्या कृपेवर अवलंबून असून बळीराजा आशेने पावसाची वाट पाहत आहे.
अर्धे मृग नक्षत्र संपले, पावसाची पाठ; रत्नागिरीतील बळीराजा मोठ्या संकटात
Leave a Comment
