वीजबील माफीची घोषणा शेतकऱ्यांसाठी नाही तर अदानीसाठी; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवरुन हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

Gramin Varta
40 Views

मुंबई : शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली असली तरी अद्याप कर्जमाफी झालेली नाही तरीही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम सुरु आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांना वीजबील माफ केल्याची घोषणा करण्यात आली आहे, ही घोषणाही फसवी व दिशाभूल करणारी आहे.

वीज बील माफीची घोषणा ही शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही तर लाडका उद्योगपती अदानीसाठी केलेली आहे. भाजपा सरकारला एमएसईबी च्या चारही विभागाचे खाजगीकरण करून ते अदानीला आंदण द्यायचे आहे, त्याच्या फायद्यासाठी ही घोषणा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजबील माफीच्या केलेल्या घोषणेवरुन सपकाळ यांनी टीका केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा सरकार सर्वच क्षेत्राचे खाजगीकरण करत आहे. आता शिक्षण क्षेत्राचेही खाजगीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचा डाव आहे म्हणूनच राज्यातील शासकीय शाळा बंद पाडल्या जात आहेत. ज्या शासकीय शाळा अजून आहेत, त्यांना कसल्याच सुविधा नाहीत, वीज नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, स्वच्छतागृह नाहीत, अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. सरकारला या शाळा सुरु ठेवायच्या नाहीत. शासकीय शाळा बंद पाडून खाजगी कंपन्यांच्या हाती शिक्षण क्षेत्र देण्याचा प्रयत्न आहे. शिक्षणाचे खाजगीकरण व बाजारीकरण करून बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी हा घाट घातला जात आहे. राज्याला शिक्षण मंत्री आहेत का, हेच समजत नाही. दादा भुसे यांनी कठोर निर्णय घेऊन शासकीय शाळा वाचवल्या पाहिजेत, पण ते फक्त भ्रष्टाचार करत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक देशविरोधी

मतदार पुनर्रचना विधयेक हे देशाच्या एकतेला धोका पोहचवणारे आहे. या विधेयकामागील भाजपाचा हेतू देशाचे दक्षिण व उत्तर असे दोन तुकडे करण्याचा आहे म्हणूनच संसदेच्या मागील अधिवेशनात हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा हे विधेयक मंजूर करण्याचा आटापिटा भाजपाने सुरु केला आहे, त्यासाठीच तृणमूल काँग्रेस व शिवसेना उबाठा पक्ष पुन्हा एकदा फोडण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने या विधेयकावरील आपली भुमिका आधीच स्पष्ट केली असून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची चिरफाड संसदेत केलेली आहे. भाजपाला वन नेशन वन पॉलिटीकल पार्टी व्यवस्था देशात आणायची आहे, असेही सपकाळ यांनी स्पष्ट केले.

सोनम वांगचुक यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सोनम वांगचुक यांनी ज्या मागण्यासाठी उपोषण सुरु केले आहे, त्याच मागण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन सुरु केलेले आहे. नीट पेपर लिकचा मुद्दा काँग्रेस पक्षाने लावून धरला असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी एल्गार पुकारला आहे. राहुल गांधी यांनी छात्रों की गुंज अभियान सुरु केलेले आहे. राजस्थानच्या कोटा शहरातून सुरु केलेल्या अभियनाचा १७ तारखेला डेहराडून येथे कार्यक्रम होत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *