रत्नागिरी: साखरतर आणि परिसरातील कासारवेली, बसणी, काळबादेवी, म्हामूरवाडी यांसारख्या गावांमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वीजपुरवठ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. या भागात दररोज आठ ते दहा तास वीज खंडित होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, सामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही महावितरण प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्थानिक वायरमन आणि विभागीय अभियंता नागरिकांचे फोन उचलण्यासही टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या कामकाजाबाबत तीव्र असंतोष पसरला आहे.
या संदर्भात ग्रामपंचायतीकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे, परंतु महावितरणने अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. सातत्यपूर्ण वीज खंडितीमुळे विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत आहे. जर आगामी काळातही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे. आता तरी संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा अखंडित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
