रत्नागिरी: विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी पुकारलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी होणे रत्नागिरीतील जिल्हा परिषदेच्या २,४३७ शिक्षकांना चांगलेच महागात पडले आहे. प्रशासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेत, सहभागी शिक्षकांवर ‘नो वर्क, नो पे’ (काम नाही, वेतन नाही) या तत्त्वानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे. पूर्वपरवानगी न घेता सामूहिक रजा घेणे किंवा कर्तव्य बजावण्यापासून दूर राहणे हा प्रशासकीय शिस्तीचा भंग असल्याचे नमूद करत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी शिक्षक संघटनांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शिक्षकांनी प्रतिसाद दिल्याने अनेक शाळांमधील शैक्षणिक कामकाज ठप्प झाले होते. मात्र, या आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि प्रशासकीय शिस्त पाळण्याचे आवाहन दुर्लक्षित झाल्याने, जिल्हा परिषद प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिक्षक वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली असून, शिक्षक संघटनांकडून या निर्णयाचा तीव्र निषेध केला जात आहे. आंदोलनादरम्यानच प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षक संघटना आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या कारवाईनंतरचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
