Category: बातम्या

  • मंडणगड तालुक्यातील कळकवणे येथे ८७ वर्षीय वृद्धाची गळफास घेत आत्महत्या

    मंडणगड तालुक्यातील कळकवणे येथे ८७ वर्षीय वृद्धाची गळफास घेत आत्महत्या

    मंडणगड : तालुक्यातील कळकवणे गावातील एका ८७ वर्षीय वृद्धाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाणकोट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावजी अर्जुन पवार (वय ८७, रा. कळकवणे, ता. मंडणगड) हे ३ जून २०२६ रोजी दुपारच्या सुमारास जनावरांच्या गोठ्यात काम करण्यासाठी गेले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नसल्याने त्यांचे पुत्र संजय रावजी पवार यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

    संजय पवार यांनी प्रथम गोठ्यात जाऊन पाहणी केली. मात्र तेथे रावजी पवार आढळून न आल्याने त्यांनी नातेवाईक, गावकरी तसेच परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोधादरम्यान सोनू टेंबीचा टेप या ठिकाणी भोंडग्याच्या झाडाला काळ्या रंगाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत रावजी पवार आढळून आले.

    घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. त्यानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने गळफासाची दोरी कोयत्याने कापून त्यांना खाली उतरविण्यात आले आणि खाजगी वाहनातून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मंडणगड येथे नेण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

    या घटनेची नोंद बाणकोट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत करण्यात आली असून मृत्यूमागील कारणांचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

  • शिरगाव येथे मठामागे आढळला ५४ वर्षीय प्रौढाचा मृतदेह

    शिरगाव येथे मठामागे आढळला ५४ वर्षीय प्रौढाचा मृतदेह

    चिपळूण : तालुक्यातील शिरगाव येथील शिगवण मठाच्या पाठीमागील परिसरात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश राजाराम यादव (वय ५४, रा. अलोरे देऊळवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांचा मृतदेह ३ जून २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिरगाव येथील शिगवण मठाच्या पाठीमागील परिसरात उपड्या अवस्थेत आढळून आला.

    मयत महेश यादव हे दारूच्या अतिव्यसनाधीन असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. ते अनेकदा विविध ठिकाणी वास्तव्यास राहत असत तसेच अधूनमधून आपल्या मूळ गावी अलोरे देऊळवाडी येथे ये-जा करत असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली.

    दरम्यान, शिरगाव पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईक प्रमोद राजाराम यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली असता तो महेश यादव यांचाच असल्याची खात्री झाली.

    या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू क्रमांक १३/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अंतर्गत करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

  • भंगार दुकानातून नंबर प्लेटविरहित दुचाकी जप्त; रत्नागिरी शहर पोलिसांची कारवाई

    भंगार दुकानातून नंबर प्लेटविरहित दुचाकी जप्त; रत्नागिरी शहर पोलिसांची कारवाई

    रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिसांनी साळवी स्टॉप परिसरातील डंपिंग ग्राऊंडजवळील एका भंगार दुकानावर छापा टाकून नंबर प्लेट नसलेली संशयास्पद दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी भंगार व्यावसायिकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिवराम शिंगवे हे ३ जून २०२६ रोजी शहर परिसरात नियमित पेट्रोलिंग करत होते. दुपारी सुमारे ४.४५ वाजण्याच्या सुमारास ते साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंड परिसरात पोहोचले असता तेथील एका भंगार दुकानाची तपासणी करण्यात आली.

    तपासणीदरम्यान दुकानात नंबर प्लेट नसलेली सिल्व्हर रंगाची अॅक्सेस दुचाकी आढळून आली. याबाबत दुकान चालक रियाज फारुख अफराज (वय २१, रा. स्टेट बँक कॉलनी, चर्मालय, रत्नागिरी) याच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र संबंधित दुचाकीची कोणतीही वैध कागदपत्रे त्याच्याकडे आढळून आली नाहीत. तसेच चौकशीदरम्यान त्याने समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची भूमिका घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

    पोलिसांनी सुमारे ५ हजार रुपये किमतीची सिल्व्हर रंगाची अॅक्सेस दुचाकी ताब्यात घेतली आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनाचा चेसिस क्रमांक MB8CF4CAAB8166444 असून इंजिन क्रमांक K486-527392 असा आहे.

    या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८०/२०२६ नुसार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

  • खेड: चाकाळे येथे भावकीला शिवीगाळ करण्याचा जाब विचारताच हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    खेड: चाकाळे येथे भावकीला शिवीगाळ करण्याचा जाब विचारताच हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    खेड : भावकीतील लोकांना शिवीगाळ का करत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका ५३ वर्षीय व्यक्तीला बांबूच्या काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना खेड तालुक्यातील चाकाळे खरोशीवाडी येथे घडली आहे. या घटनेत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर देवजी शिंदे (वय ५३, रा. चाकाळे खरोशीवाडी, ता. खेड) हे २ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जेवण करत होते. त्यावेळी गावातील वैभव वामन कडू हा भावकीतील लोकांना शिवीगाळ करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शिंदे यांनी घराबाहेर येऊन त्याला याबाबत विचारणा केली.

    या विचारण्याचा राग आल्याने वैभव कडू याने हातातील बांबूच्या काठीने सुधीर शिंदे यांच्या दोन्ही पायांवर मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले वामन बाळू कडू (वय ६०) आणि विनायक वामन कडू (वय ३५) यांनीही शिंदे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच तिघांनी मिळून त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

    या प्रकरणी सुधीर शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार ३ जून २०२६ रोजी रात्री १.३४ वाजता वैभव वामन कडू, वामन बाळू कडू आणि विनायक वामन कडू यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक १६०/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

  • आंबेनळी दुर्घटनेनंतर वास्तव समोर; रायगडमध्ये अपघातांचे भयावह चित्र

    आंबेनळी दुर्घटनेनंतर वास्तव समोर; रायगडमध्ये अपघातांचे भयावह चित्र

    रायगड : जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असून, गेल्या चार महिन्यांत झालेल्या अपघातांमध्ये तब्बल ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीत २५४ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, त्यामध्ये ३०५ जण जखमी झाले आहेत.

    पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात काही दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ वाहन सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    जिल्ह्यातील विविध महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर वाढती वाहनसंख्या, भरधाव वेग, धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरावस्था तसेच वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सर्वाधिक ५१ अपघातांची नोंद झाली असून, त्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अंतर्गत राज्य मार्गांवर ४६ अपघातांत १९ जणांचा बळी गेला आहे.

    अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रमुख चौकांमध्ये तपासणी मोहीम, वाहनचालकांचे समुपदेशन, जनजागृती फलक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र, या उपाययोजनांनंतरही अपघातांची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

    वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, महामार्गांची अपुरी माहिती असताना वेगाने वाहन चालविणे, रस्त्यालगत इंडिकेटर न लावता वाहने उभी करणे, खड्डे चुकविताना नियंत्रण सुटणे, अचानक लेन बदलणे, मद्यपान करून वाहन चालविणे आणि धोकादायक वळणे ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत.

    रायगडमधील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षेबाबत अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची तसेच वाहनचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे.

  • महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांवर ई-मेलद्वारे पोहोचणार प्रश्नपत्रिका

    महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांवर ई-मेलद्वारे पोहोचणार प्रश्नपत्रिका

    पुणे: दहावी आणि बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित तसेच पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

    पुढील वर्षापासून बोर्डाच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक डिजिटल सुविधा मंडळाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यात राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संयुक्त सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीस राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी, महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. या नव्या व्यवस्थेनुसार परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येतील.नवीन प्रणालीअंतर्गत परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे संबंधित परीक्षा केंद्रांवर पाठविण्यात येतील. त्यानंतर केंद्रांवरच प्रश्नपत्रिकांच्या आवश्यक प्रती छापून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार त्यांचे वितरण केले जाईल.या व्यवस्थेसाठी परीक्षा केंद्रांवर संगणक, प्रिंटर, सॉफ्टवेअर, वायफाय सुविधा आणि अन्य आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य मंडळाने स्वीकारली आहे.या नव्या उपक्रमामुळे प्रश्नपत्रिका वाहतूक, साठवणूक आणि सुरक्षेशी संबंधित अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका गळती रोखणे, परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित करणे आणि कागदाचा वापर नियंत्रित ठेवणे यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिक्षण मंडळाने व्यक्त केला आहे.राज्यातील लाखो विद्यार्थी आणि हजारो परीक्षा केंद्रांसाठी ही डिजिटल परीक्षा व्यवस्था महत्त्वाचा बदल ठरणार असून तिच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तयारी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

  • कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; उर्वरित प्रश्न सोडविण्यावर भर देणार : अनिकेत तटकरे

    कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध; उर्वरित प्रश्न सोडविण्यावर भर देणार : अनिकेत तटकरे

    चिपळूण : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी चिपळूण येथे पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्या भूमिकेचे स्वागत करत त्यांचे मनापासून आभार मानले. कोकणच्या विकासाशी संबंधित उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्याने काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

    अनिकेत तटकरे म्हणाले की, या निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच ही बिनविरोध निवड शक्य झाली. यासाठी त्यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे तसेच मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे आभार व्यक्त केले.

    महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाही प्रक्रियेत महत्त्वाचा असल्याचे सांगत तटकरे यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. “बाळ माने यांनी घेतलेल्या निर्णयामुळे निवडणूक बिनविरोध झाली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो,” असे ते म्हणाले.

    यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी “सुनील तटकरेंकडे भानामती आहे” असे वक्तव्य करून त्यांच्या राजकीय करिष्म्याला अप्रत्यक्षपणे मान्यता दिल्याची टिप्पणी केली. सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात विकासाची अनेक कामे झाली असून त्याच विकासाच्या धाग्याला पुढे नेण्याचे काम आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    कोकणातील पायाभूत सुविधा, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, उद्योग, शिक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषद सदस्य म्हणून सक्रियपणे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

    या विजयाबद्दल बोलताना अनिकेत तटकरे यांनी हा विजय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्पित करत असल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि महायुतीच्या एकजुटीमुळेच हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

    कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.
    .

  • बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायाबद्दल कारवाई

    बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायाबद्दल कारवाई

    मुंबई: राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यामध्ये राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.

    यातच कोकणात एक धक्कादायक ट्विस्ट समोर आला आहे. तो म्हणजे मविआचे उबाठाचे उमेदवार बाळ माने यांनी भाजपच्या नितेश राणेंसोबत जात परस्पर अर्ज माघारी घेतल्याने त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याबद्दल त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी केली.

    नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

    याबाबत ट्विट करताना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलं की, बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्या बद्दल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.