लांजा : लांजा शहराजवळील धुंदरे सुतारवाडी येथे ३५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री उघडकीस आली.
मृत तरुणाचे नाव अविनाश हरिश्चंद्र पांचाळ (वय ३५, रा. धुंदरे सुतारवाडी, ता. लांजा) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अविनाश हा शेजारी राहणाऱ्या बाळकृष्ण करंबळे यांच्या घरी गणपती विसर्जन निमित्ताने आयोजित जेवणावळीला गेला होता. जेवणानंतर तो घरी आला आणि थोड्याच वेळात आईला “मी बाहेर जरा जाऊन येतो” असे सांगून निघून गेला.
बराच वेळ लोटल्यानंतर तो घरी न परतल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी शोध घेतला. अखेर घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास लावून तो लटकलेला अवस्थेत आढळून आला. तत्काळ त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
लांजा पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे अधिक तपास करीत आहेत.
लांजामध्ये ३५ वर्षीय तरुणाची आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या





