रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील नामांकित कुणबी समाजनेते आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती, तसेच संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सुनील गोपाळ नावले (वय अंदाजे ५०) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळीच ते कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा–रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित ओबीसी आरक्षण आंदोलनात सहभागी झाले होते. मात्र सायंकाळी त्यांच्या मृत्यूची वार्ता धडकल्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सोमवारी झालेल्या आंदोलनानंतर ते आपल्या रत्नागिरी येथील निवासस्थानी परतले. दुपारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते तपासणीसाठी रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जात असताना प्रकृती अधिक खालावली. तातडीने उपचार सुरू करण्यात आले; मात्र वैद्यकीय प्रयत्नांनंतरही त्यांना मृत घोषित करण्यात आले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात धावले. सकाळपर्यंत आंदोलनात सक्रिय राहून संध्याकाळीच कायमची साथ सोडणाऱ्या या समाजनेत्याच्या जाण्याने रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सकाळी आंदोलनात सहभागी, सायंकाळी अचानक मृत्यू; कुणबी समाजनेते सुनील नावले यांच्या निधनाने हळहळ






