नवी मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सूचनेनुसार प्राथमिक, माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थ्यांचे गट तयार करून ‘विद्यार्थी समूह’ उपक्रम राबविला जाणार आहे.
या गटांमध्ये समान आवड असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र करून ते एकमेकांना मार्गदर्शन करतील, विविध उपक्रम राबवतील आणि शैक्षणिक तयारीत मदत करतील. पर्यावरण, विज्ञान, क्रीडा, कला, तंत्रज्ञान, आरोग्य आदी ३४ वेगवेगळ्या विषयांवर हे समूह आधारित असतील.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना, नेतृत्वगुणांचा विकास, तसेच सहयोगी शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे हा उद्देश असून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने ही संकल्पना पुढे आली आहे.
नवीन गटांची निर्मितीही शाळांना स्वतःच्या पातळीवर करता येणार असून, एक विद्यार्थी एकापेक्षा जास्त गटांमध्ये सहभागी होऊ शकेल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीभाव, कल्पकता व शैक्षणिक उन्नती घडेल, असा शिक्षण विभागाचा विश्वास आहे.
समान आवडनिवड असलेली मुले शाळेत एकमेकांना शिकवणार






