GRAMIN SEARCH BANNER

‘ऑक्टोबर हिट’ मानवी आरोग्यावर परिणाम

Gramin Varta
238 Views

साखरपा/ सिकंदर फरास: पाऊस जाऊन काही दिवसच झाले असताना अनेक भागांत सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. वातावरणात झालेल्या या अचानक बदलामुळे उष्णतेचं प्रमाण दिवसागणिक वाढू लागले असून, सामान्य नागरिकांसह विविध आरोग्य समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांचे हाल झाले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे मोठे आव्हान बनले आहे.

या वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. अनेक नागरिकांना कमी भूक लागणे, तीव्र डिहायड्रेशन (पाण्याची कमतरता) आणि सतत चक्कर येणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रक्तदाबाचा (BP) त्रास असलेल्या व्यक्तींसाठी ही वाढलेली उष्णता अधिक धोकादायक ठरत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे त्यांना अचानक चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, तीव्र अशक्तपणा जाणवणे अशा गंभीर तक्रारी समोर येत आहेत. रुग्णालयांमध्ये उष्माघाताशी संबंधित तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. नागरिकांनी शक्यतो दुपारी १२ ते ३ या सर्वाधिक उष्णतेच्या वेळेत घराबाहेर पडणे पूर्णपणे टाळावे. जास्त उन्हामध्ये काम केले असल्यास त्वरित विश्रांती घ्यावी आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी फॅन किंवा एसीचा वापर करावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पाणी, लिंबूपाणी, नारळपाणी आणि विशेषतः ताक नियमितपणे प्यावे. ताक शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरते. तसेच, बाहेर जाताना डोक्याचे संरक्षण करणे आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरणे अत्यावश्यक आहे. या बदलत्या वातावरणात नागरिकांनी गाफील न राहता योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

Total Visitor Counter

2651887
Share This Article