GRAMIN SEARCH BANNER

आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर संगमेश्वरात पावसाचा हाहाकार; भातशेतीचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Gramin Varta
238 Views

संगमेश्वर/ सिकंदर फरास: गेल्या आठवड्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने संगमेश्वर तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे भात कापणीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या शेतकरी बांधवांची मोठी तारांबळ उडाली. या अकाली आणि अनपेक्षित पावसामुळे शेतात कापून ठेवलेल्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आधीच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी वर्गाची चिंता अधिकच वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यामुळे तालुक्यातील शेतकरी भात कापणीच्या कामात पूर्ण वेगाने गुंतले होते. अनेकांनी आपल्या शेतातील पीक कापून गंजी लावण्यासाठी किंवा मळणीसाठी योग्य ठिकाणी हलवण्यासाठी तयारी सुरू केली होती. मात्र, अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे शेतात कापून ठेवलेले भात भिजले गेले. हे भिजलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः धावाधाव करावी लागली, तसेच ते सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागली.

कापलेले भात मोठ्या प्रमाणावर भिजल्यामुळे पिकाच्या गुणवत्तेवर आणि उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे. पहिलेच भातपीक कापणीसाठी विलंब झाल्यामुळे काही प्रमाणात ‘आढाव’ (नुकसानग्रस्त किंवा खराब) झाले होते. त्यातच आता या पावसाच्या पुनरागमनाने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.

आठवडाभर पावसाने उसंत घेतल्यामुळे भात कापणीच्या कामाला जो वेग आला होता, तो या पावसामुळे पूर्णपणे मंदावणार आहे. शेते पुन्हा चिखलमय झाल्यामुळे कापणी आणि मळणीच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या अकाली पावसाने ऐन हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, शासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

3199544
Share This Article