छोट्या व्यावसायिकांवर कारवाई ; मात्र मोठ्या व्यावसायिकांना अभय
रत्नागिरी : राज्यात जुगार व मटका व्यवसायाविरुद्ध कडक बंदी असूनही रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत हा गैरकायदेशीर व्यवसाय बेधडकपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबतची तक्रार ऑनलाइन करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, गुन्हे शाखेचे उपअधीक्षक आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनाही अनेक अर्ज व ऑनलाईन तक्रारी केल्या; परंतु त्यावर गंभीरपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारदारांनी स्पष्ट केले आहे की तक्रार करूनही दुर्लक्ष केल्यामुळे पोलीसांचा निष्काळजीपणा समोर आणणे गरजेचे झाले आहे. त्यामुळेच लोकांचा विश्वास पोलिस यंत्रणेतून घसरत आहे आणि सामाजिक वातावरण धोक्याच्या दिशेने जात आहे.
तक्रारीत मटका किंग, पेटकर (चिपळूण/रत्नागिरी), लकाटे, नारकर (राजापूर/पाचल), खेडेकर यांची नावे दिली आहेत. या नावांसह देण्यात आलेल्या पुराव्यांनाही अजूनपर्यंत कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही. पोलिस आपल्या भागातील छोट्या मटका व्यावसायिकांना पकडून कारवाई करतात आणि आपली पाठ थोपटून घेतात. तसेच कारवाई केल्याच्या बातम्या प्रसिद्ध करून केल्या की तडे दिवस धंदे बंद मग पुन्हा सुरू होतात. खेड मध्ये ही पोलिस अधीक्षकांनी मटका, जुगार व्यवसाय बंद करण्याची तंबी दिली होती. 2- 3 दिवस बंद ठेवण्यात आले मग पुन्हा सुरू. पोलिसांनी आता मटके वाले जुमानेनासे झाले आहेत का? छोट्या व्यावसायिकावर लगेच कारवाई होते मग मोठ्या व्यावसायिकांवर का कारवाई केली जात नाही. नावे देऊन तक्रार करूनही पोलिस दुर्लक्ष करत असतील तर मोठे मटका किंग पोलिसांचे सगेसोयरे आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एका तक्रारदाराने ऑनलाइन केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, तातडीने स्वतंत्र चौकशी, दोषींविरुद्ध गुन्हे नोंद करून प्रशासनाने माहिती सार्वजनिक करावी. मात्र या तक्रारीकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकूणच पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अनेक गोरगरीब कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मटका जोमात; तक्रार करूनही पोलिसांचे दुर्लक्ष






