डिंगणी ग्रामस्थांचा एस.टी. महामंडळाला इशारा!
संगमेश्वर : डिंगणी खाडेवाडी-गुरववाडी येथून सुटणारी एस.टी. बस वेळेत सुटत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांचा संताप उफाळून आला आहे. या अनियमिततेमुळे दररोज शाळकरी मुलं, शेतकरी, कामगार, वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात खाडेवाडी, अगरवाडी, करंडेवाडी, काष्टेवाडी, जाधववाडी आणि क्रांतीनगर (वरची बौद्धवाडी) येथील ग्रामस्थांनी डिंगणी अगरवाडी येथे एकत्र येत संतप्त बैठक घेतली. त्यानंतर ग्रामस्थांच्या प्रतिनिधी मंडळाने संगमेश्वर आणि देवरुख डेपोला भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर बस वेळेत सुटली नाही, तर सर्व गावकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभं करू.
या वेळी वामन काष्टे, श्रीपत खाडे, पांडुरंग पेजे (मा. पोलीस पाटील), यशवंत करंडे (वाडीप्रमुख), बुद्धदास कदम (क्रांतीनगर अध्यक्ष), तुकाराम पाकतेकर (माजी सरपंच), सुदर्शन मोहिते (मा. ग्रामपंचायत सदस्य), जितेंद्र जोगळे (पोलीस पाटील), कृष्णा खाडे, अनंत काष्टे, विश्वनाथ जोगळे, विवेक मोहिते, प्रकाश जाधव, चंद्रकांत गावडे, विजय जाधव, विशाल कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या या संतप्त भूमिकेमुळे एस.टी. प्रशासनावर तातडीने उपाययोजना करण्याचे दडपण आले आहे.
गाडी वेळेत न सोडल्यास तीव्र आंदोलन छेडणार








