रत्नागिरी: तालुक्यातील गणपतीपुळे या पर्यटनस्थळी दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. येथील सुंदर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक मोठ्या संख्येने येत असून काहीजण पाण्यात उतरण्याचा आनंद घेत आहेत. परंतु, सध्या गणपतीपुळे किनाऱ्यावर जेली फिशचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, ज्यामुळे पर्यटक हैराण झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी सांगितले की, जेली फिशचा त्वचेशी संपर्क झाल्यास तीव्र वेदना होतात, अंगावर बारीक पुरळ येते आणि स्पर्श झालेला भाग लालसर होतो. वेदना कमी करण्यासाठी, जेली फिशचा स्पर्श झाल्यास अगदी व्यवस्थित तळहाताने निळा दोरा काढून टाकावा. मात्र, काही वेळा वेदना चार ते पाच तास टिकतात आणि ताप देखील येतो. त्यामुळे जेली फिशचा स्पर्श झाल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. जेली फिशचा उपद्रव वाढल्यामुळे पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नये, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाने केले आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर जेली फिशचा धोका वाढला; स्पर्श होताच वेदना, पर्यटक हैराण








