रत्नागिरी: कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने कंबर कसली असून, जादा गाड्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यंदा २ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचा उत्सव असल्याने भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन रत्नागिरी एसटी विभागाने तब्बल १५२ जादा गाड्या पंढरपूरसाठी सोडण्याचे नियोजन केले आहे.
या नियोजनानुसार, आतापर्यंत १३५ गाड्यांचे थेट ‘ग्रुप बुकिंग’ पूर्ण झाले आहे. आषाढी एकादशीच्या वेळी खरीप हंगामातील शेतीची कामे असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या कमी असते; मात्र, कार्तिकी एकादशीला जिल्ह्यातील भाविक मोठ्या उत्साहाने पंढरपूरला जातात. त्यामुळेच यावर्षी १५२ गाड्या सोडण्याची तयारी एसटी विभागाने ठेवली आहे.
हे आरक्षण लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, देवरूख, खेड, दापोली या आगारांतून मोठ्या प्रमाणावर झाले आहे. विशेष म्हणजे, भाविकांनी थेट ‘ग्रुप बुकिंग’ केल्यामुळे या जादा गाड्या त्या-त्या गावातून थेट पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. २८ ते २९ ऑक्टोबरपासून या गाड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होण्यास सुरुवात होईल आणि ३ नोव्हेंबरपासून या गाड्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. जास्तीत जास्त १५२ गाड्यांचे आरक्षण होईल, असा महामंडळाचा अंदाज आहे.







