रत्नागिरी: रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार यादीतील सुमारे ७,५०० हरकतींवर नगर परिषद प्रशासनाने कार्यवाही पूर्ण केली आहे. यादी प्रसिद्ध झाल्यावर आलेल्या हरकतींमध्ये अनेक मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात दिसणे, रहिवासी नसलेल्या प्रभागात नाव असणे, तसेच नगर परिषदेच्या चुकीमुळे नावांची अदलाबदल होणे, अशा विविध तक्रारींचा समावेश होता. प्रशासनाने दाखल हरकतींचा अभ्यास करून स्थळ पाहणी केली आणि त्यानुसार यादीत दुरुस्ती सुचवली आहे. यातील सुमारे ३५० मतदारांवर आक्षेप असल्याने त्यांना नोटिसा बजावून सुनावणी पूर्ण करण्यात आली. २९ ऑक्टोबर रोजी प्रांताधिकारी जीवन देसाई यांच्याकडे या सर्व मतदारांची सुनावणी पार पडली आणि त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.
तत्पूर्वी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी शहर मतदार यादीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचा दावा करत सुमारे २३ हजार मतदार बोगस असल्याचा आक्षेप पुराव्यानिशी जिल्हा निवडणूक विभागाकडे दाखल केला होता. आता रत्नागिरी शहर मतदारांची अंतिम यादी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार असल्याने मतदारांची अचूक संख्या निश्चित होणार असून, राजकीय पक्षांच्या रणनीतीला निवडणुकीपूर्वी वेग मिळणार आहे.




