राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथील बेलाचेकोंडवाडी परिसरात बिबट्याने तरुणाचा पाठलाग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत अनिरुद्ध अनिल चव्हाण यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिरुद्ध चव्हाण हे सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून देवळाकडे जात होते. त्याचवेळी रस्त्यालगतच्या जंगलातून दोन बछड्यांसह एक बिबट्या अचानक बाहेर आला आणि त्याने अनिरुद्ध यांच्या दुचाकीचा पाठलाग केला. प्रसंगावधान राखून अनिरुद्ध यांनी तात्काळ पळ काढला. काही क्षणांतच बिबट्या बछड्यांसह पुन्हा जंगलात परतला.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या संदर्भात वाडीतील ग्रामपंचायत सदस्य प्रशांत दादा चव्हाण, तसेच प्रकाश पांडुरंग चव्हाण, रवींद्र पांडुरंग चव्हाण, रामचंद्र इंदुलकर यांच्या मार्फत वनविभागाकडे तात्काळ निवेदन सादर करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी बिबट्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
राजापुरात दुचाकीस्वार तरुणाचा बिबट्याने केला पाठलाग; परिसरात भीतीचे वातावरण







