दिल्ली: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने नोव्हेंबरच्या सुरुवातीला एकदिवसीय विश्वचषक जिंकून भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले होते.
आता दृष्टीहीन महिला क्रिकेट संघाने पहिला वहिला टी२० विश्वचषक जिंकून यावर कळस चढवला आहे. कोलंबो येथे झालेल्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळवर सात विकेट्सनी विजय मिळवला.
रविवारी (२३ नोव्हेंबर) श्रीलंकेच्या कोलंबोमधील पी सारा ओव्हल येथे अंतिम सामना खेळवला गेला. नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णयय घेतला. २० षटकांत नेपाळच्या संघाने ५ बाद ११४ एवढी धावसंख्या उभारली. भारतीय संघाने केवळ १२.१ षटकांत तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले.
लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारताकडून फुला सरेनने सर्वाधिक नाबाद २७ चेंडूत ४४ धावा केल्या. १६२.९६ च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना फुला सरेनने चार चौकार चोपले. फुलाच्या नाबाद खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला. फलंदाजी व्यतिरिक्त फुला सरेनने तीन षटके टाकली होती. ज्यात तिने २० धावा दिल्या.फुला सरेनच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल तिला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दीपीका टीसी भारताची कर्णधार
भारतीय संघाचे कर्णधारपद दीपिका टीसीकडे आहे. कर्नाटकातून आलेल्या दीपीकाने लहानपणी अपघातात दृष्टी गमावली होती. शालेय शिक्षण घेत असताना ती क्रिकेट खेळायला लागली. तर गंगा कदम उपकर्णधार आहे.
महिला क्रिकेट संघाने जिंकला पहिला वहिला दृष्टीहीन टी-२० वर्ल्ड कप





