रत्नागिरी : महाराष्ट्र अॅक्वाटिक असोसिएशनच्या वतीने मालवण येथील चिवला बीचवर आयोजित राज्यस्तरीय ओपन सागरी जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जलतरणपटूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत रत्नागिरीतील एकूण नऊ जलतरणपटूंनी सहभाग घेत आव्हानात्मक स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली.
स्पर्धेपूर्वी गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जलतरणपटू भाटये समुद्रकिनारी नियमित सराव करत होते. मालवणच्या समुद्रात जेलीफिशचा त्रास, अत्यंत थंड पाणी तसेच प्रचंड लाटा यांमुळे ही स्पर्धा अत्यंत कठीण मानली जाते. अशा परिस्थितीतही राज नितीन राऊत, यश देवदास, आयुष चव्हाण, श्रीयांश वाघाटे, रत्नराज पाटील, रुद्र लाड, ऑस्टीन फ्रँको आणि जतीन भोसले यांनी जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर स्पर्धा पूर्ण केली.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रभरातून सुमारे १,५०० जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. १२ वर्षांखालील गटासाठी २ किलोमीटर, १४ वर्षांखालील गटासाठी ३ किलोमीटर, तर २५ वर्षांखालील गटासाठी ५ किलोमीटर अंतराची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये २५ वर्षांखालील गटात ॲक्वा टेक्निक स्विमिंग अकादमीचा यश देवदास याने ५ किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळवत नववा क्रमांक पटकावला आणि रत्नागिरीला पदक मिळवून दिले.
या सर्व जलतरणपटूंना एआयएस, एसएफआय आणि एएससीए सर्टिफाईड प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रत्नागिरीच्या या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जलतरणपटूंची दमदार कामगिरी






