नवी मुंबई – अनेक दशकांची प्रतीक्षा, नियोजन, संघर्ष आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिपाक अखेर प्रत्यक्षात उतरत आहे. २५ डिसेंबर २०२५ म्हणजे नाताळ सणाच्या साक्षीने नवी मुंबईच्या आकाशात पहिले प्रवासी विमान झेपावणार असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहे.
सिडकोचे सर्वात महत्त्वाकांक्षी स्वप्न साकार करणारा हा क्षण केवळ नवी मुंबई, पनवेलपुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्र आणि देशाच्या पायाभूत विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणारा ठरणार आहे.
देशातील अत्याधुनिक हरितपट्टा (ग्रीनफिल्ड) विमानतळ म्हणून विकसित झालेल्या या प्रकल्पाच्या यशस्वी उभारणीमागे ‘सिडको’ची दूरदृष्टी, काटेकोर नियोजन आणि सक्षम अंमलबजावणी ठळकपणे दिसून येते. पहिल्याच दिवशी एकूण ३० एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्ससह (ATMs) विमानतळाचे संचालन सुरू होणार असून, ही सिडकोसाठी ऐतिहासिक झेप मानली जात आहे.
विमानतळ नियोजनापासून प्रत्यक्ष उड्डाणापर्यंतचा हा सारा प्रवास अनेक दशकांचा आहे. या काळात विविध शासकीय यंत्रणा, तांत्रिक तज्ज्ञ आणि अंमलबजावणी संस्थांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण या प्रकल्पातून समोर आले आहे. विमानतळ सुरू झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होणार असून, मल्टी-एअरपोर्ट प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.
कमळाकृती संकल्पनेवर आधारित भव्य टर्मिनल रचनेसाठी अदानी समूह आणि एनएमआयएएल यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. भारतीय सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन घडविणारी ही वास्तुरचना शाश्वत विकास, नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरत आहे.
विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई, पनवेल, उरण, कर्जत, पेण या परिसराचे महत्व व्यावसायिक दृष्ट्या वाढेल. तसेच या परिसरासह ठाणे, पुणे, रायगड या जिल्ह्यांसह कोकणातील नागरिकांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ होणार आहे. महामार्ग, द्रुतगती मार्ग, रेल्वे, मेट्रो आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसारख्या प्रकल्पांमुळे विमानतळाची मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होणार आहे. रोजगारनिर्मिती, पर्यटनवृद्धी आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठीही हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
पहिल्या दिवशीची उड्डाणे (२५ डिसेंबर ) :
इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या विमान कंपन्यांची सेवा सुरू होणार आहे.
पहिले आगमन – ६ ई ४६० (बेंगळुरूहून) सकाळी ८ वाजता
पहिले प्रस्थान – ६ई ८८२ (हैदराबादकडे) सकाळी ८.४० वाजता
दोन दिवसांनंतर पहाटेपासून नवी मुंबई आणि पनवेलच्या डोक्यावरून विमानांचे नियमित उड्डाण सुरू होईल. हा क्षण पनवेल परिसराला विकासाच्या शिखरावर नेणारा, यशाची नवी ओळख निर्माण करणारा ठरणार आहे.
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनास प्रारंभ होणे हे महाराष्ट्र शासन व सिडकोची पायाभूत सुविधा विकासाबाबतची सातत्यपूर्ण बांधिलकी अधोरेखित करते. हा प्रकल्प सिडकोच्या बांधिलकीची हमी देत असून भविष्योन्मुख पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि जागतिक स्तरावरील कनेक्टिव्हिटीसाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो. या प्रवासात विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हे सामूहिक यश आहे.” – विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ
नवी मुंबई विमानतळावर पहिले प्रवासी विमान उद्या सकाळी आठ वाजता उतरणार





