GRAMIN SEARCH BANNER

राज्यघटनेतील तिसाव्या कलमामुळे हिंदूंची कोंडी – आफळेबुवा

Gramin Varta
182 Views

रत्नागिरी : भारतीय राज्यघटनेतील तिसावे कलम हिंदूंसाठी अत्यंत हानिकारक आहे. त्यामुळे देशात बहुसंख्येने असलेल्या हिंदूंची कोंडी होते, असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त बुवा आफळे यांनी केले.

येथील स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुलात सुरू असलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात तिसऱ्या दिवशी निरूपण करताना ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यघटनेतील या तिसाव्या कलमाचा समावेश तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता. त्यानुसार धर्मशिक्षणाचा पूर्ण अधिकार अल्पसंख्य असलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चनांना देण्यात आला. त्यांच्या त्यांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या धर्माचे रीतिरिवाज अनिवार्य करण्यात आले. मात्र हिंदूंना तो अधिकार देण्यात आलेला नाही. हिंदूंच्या शाळांमध्ये रामरक्षा म्हणण्याची परवानगी नाही. अन्य धर्मीयांच्या शाळांमध्ये हिंदू मुलांकडून त्यांच्या धर्माच्या बाबी वदवून घेतल्या जातात. हिंदूंच्या शाळांमध्ये मात्र अन्य धर्मीय मुले असतील तर त्यांना रामरक्षा किंवा हिंदूंची स्तोत्रे न म्हणण्याची मुभा आहे. तसे राज्यघटनेच्या त्या तिसाव्या कलमात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूंची कोंडी झाली आहे, असे आफळेबुवा म्हणाले.
आपल्या आपल्या धर्माच्या गोष्टी करणे म्हणजे राज्यघटनेच्या विरोधात केलेले कृत्य नाही. हिंदूंनीही लक्षात ठेवले पाहिजे. अन्य धर्मीयांच्या संघटितपणाचा गुण हिंदूंनीही घेतला पाहिजे. मंदिरांमधील प्रवचने, कीर्तने याकडे हिंदूंकडूनच गांभीर्याने पाहिले जात नाही, याचे वैषम्य वाटत असल्याचे बुवांनी सांगितले.

दरम्यान, महाभारत युद्धाचे वर्णन बुवांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी केले प्रत्यक्ष. युद्धभूमीवर असल्याप्रमाणे त्यांनी केलेल्या वर्णन प्रभावी ठरले. कौरव आणि पांडवांचे प्रत्यक्ष युद्ध, युद्धातील डावपेच, सैन्याची रचना, पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ उभे राहण्याची रचना, सैनिक, रथी आणि महारथी यामधील फरक यांचे वर्णन बुवांनी केले. कौरवांच्या बाजूने लढताना भीष्मांची होणारी कुचंबणा, पांडवांच्या बाजूने असलेल्या श्रीकृष्णाने रचलेले डावपेच इत्यादींचे वर्णन बुवांनी चित्रमय शैलीने केले. राजस्थानातील खाटू श्याम या तीर्थस्थळाविषयीची माहिती बुवांनी दिली.

समाजात वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांची वाढत असलेली संख्या कुटुंबव्यवस्था खिळखिळी झाल्याचे दर्शविते. मात्र धोरणकर्त्यांनी याचा विचार करून किमान वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम एकत्र करण्याची कोणतीतरी व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे वृद्धांना मुलांचा आधार वाटेल आणि अनाथ मुलांना आजीआजोबांचे प्रेम लाभायला मदत होईल, असेही बुवांनी सांगितले.

तिसऱ्या दिवशीच्या मध्यांतरात रत्नागिरीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. शल्पा सुर्वे, नवनिर्वाचित नगरसेवक राजू तोडणकर आणि सौ. करमरकर यांचा आफळेबुवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Total Visitor Counter

3199472
Share This Article