रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी आगामी पाच दिवसांचा कृषी हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे. प्राप्त अंदाजानुसार, १० ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या काळात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४९ ते ६२ टक्के आणि दुपारची आर्द्रता ४० ते ५४ टक्क्यांपर्यंत राहू शकते, तसेच वाऱ्याचा वेग ताशी ३.७ ते ७.६ किलोमीटर इतका मर्यादित राहील. बहुतांश काळ आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, १६ ते २२ जानेवारी दरम्यान जिल्ह्यात पावसाची कोणतीही शक्यता नाही.
सध्याच्या कोरड्या आणि दमट हवामानामुळे आंबा व काजू पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आंबा बागांमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी ठराविक टप्प्यांवर कीटकनाशक फवारणीचा सल्ला दिला आहे. विशेषतः बोंगे फुटण्याच्या अवस्थेत पालवी असताना डेल्टामेथ्रीन, तर मोहोर फुटण्याच्या काळात लॅम्बडा सायहॅलोथ्रीनची फवारणी करणे फायदेशीर ठरेल. तसेच, तापमानात सातत्याने घट होत राहिल्यास जुन्या मोहोरावरील फळगळ रोखण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काजू बागायतदारांनीही ‘टी मोस्किटो बग’ आणि फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी नवीन पालवी फुटल्यापासून फळधारणेपर्यंत कीटकनाशकांच्या तीन फवारण्या पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
फळबागांसोबतच इतर पिकांच्या व्यवस्थापनाबाबतही सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. मोहरी पिकाची पेरणी होऊन एक महिना झाला असल्यास युरिया खताची मात्रा देऊन मावा किडीपासून संरक्षणासाठी डायमेथोएटची फवारणी करावी. भुईमूग उत्पादकांनी शेंगांची संख्या वाढवण्यासाठी पिकावरून रिकामे पिंप फिरवण्याचे तंत्र अवलंबावे, ज्यामुळे उत्पादनात १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. भाजीपाला पिकांमध्ये वांगी, मिरची आणि टोमॅटोवर पांढरी माशी व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चिकट सापळ्यांचा वापर करावा आणि पिकाच्या गरजेनुसार ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. नारळ बागेत रुगोज चक्राकार पांढऱ्या माशीचे संकट टाळण्यासाठी नियमित पाण्याची फवारणी आणि मित्र कीटकांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
हवामानातील बदलांमुळे पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट होत असल्याने जनावरांच्या गोठ्यात उबदार वातावरण राखण्यासाठी खिडक्यांना गोणपाटाचे पडदे लावावेत आणि कोंबड्यांच्या शेडमध्ये गरजेनुसार विजेचे बल्ब लावून उष्णतेची व्यवस्था करावी. हळद पिकाची काढणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी कंद योग्य प्रकारे शिजवून वाळवण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. या कृषी सल्ल्याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीमार्फत कळवण्यात आले आहे.






