जाकादेवी/संतोष पवार: रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील वळवी नामक व्यक्तीच्या विहिरीत पाच ते सहा दिवसांपूर्वी नर जातीच्या बिबट्याचा विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी( १०) रोजी सकाळी उघडकीस आली.
श्री. वळवी नावाची व्यक्ती आपल्या खाजगी कामानिमित्ताने आठ- दहा दिवसांपूर्वी बाहेरगावी गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची घटना घडली. घरमालक घरी नसल्यामुळे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना अनेक दिवस कोणाच्याही लक्षात आली नाही.परिसरातील कामगारांना पाच सहा दिवसानंतर परिसरातील वासाच्या साहाय्याने दृष्टीस पडली. कुत्रा किंवा मांजर अशा हलक्या भक्ष्यांच्या शोधामध्ये असताना विहिरीची साधी जाळी बिबट्याच्या वजनाने फाटून तो खोल विहिरीतील पाण्यात पडला.
साधारणतः सात ते आठ वर्षांचा नर जातीचा बिबट्या होता.बिबट्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समजतात परिसरातील कार्यकर्ते ,ग्रामस्थ ,नागरिक, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी मोठी गर्दी केली होती.परिक्षेत्र वन अधिकारी श्री प्रकाश सुतार, वनरक्षक विभागाचे एन. एस. गावडे,या विभागाच्या शर्वरी कदम यांच्या मदतीला खालगाव जाकादेवी येथील सेवाभावी ग्रामस्थ, तरूणांनी शर्तीचे प्रयत्न करून मोठ्या कौशल्याने खोल विहिरीतून बिबट्याला बाहेर काढले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या शवाची तपासणी केली. शव पी.एम. करण्यायोग्य नसल्याने शव जाळून नष्ट करण्यात आला. यावेळी वनरक्षक विभागाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी,खालगावचे धडाडीचे सरपंच प्रकाश खोल्ये,उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते कैलास खेडेकर परिसरातील सेवाभावी ग्रामस्थ, सेवाभावी तरूण कार्यकर्ते यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मृत बिबट्याला बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी हातभार दिला.






