सावर्डे : ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि बांबू क्रांतीच्या माध्यमातून शाश्वत उपजीविकेचे मॉडेल उभे करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील नामवंत तज्ज्ञ संजीव करपे यांना सन २०२६ चा मानाचा शिक्षणमहर्षि गोविंदरावजी निकम ‘सह्याद्री पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या वतीने संस्थेचे संस्थापक आणि माजी खासदार स्व. गोविंदरावजी निकम साहेब यांच्या जयंती महोत्सवाच्या औचित्याने हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ संजीव करपे यांनी कोकणच्या मातीत बांबू लागवडीपासून ते त्याच्या जागतिक विपणनापर्यंत जे अतुलनीय कार्य केले आहे, त्याची दखल या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली आहे.
संजीव करपे हे कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर (KONBAC) चे मार्गदर्शक संचालक असून, त्यांनी बांबू क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. १९९८ साली मोहन होडावडेकर यांच्या सहकार्याने आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘कोनबॅक’ची स्थापना केली. केवळ बांबूची लागवड न करता, त्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करून जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याचे मोठे आव्हान त्यांनी यशस्वीपणे पेलले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो ग्रामीण कारागीर, महिला आणि तरुण कौशल्याधारित रोजगाराच्या संधी प्राप्त करून स्वावलंबी झाले आहेत. त्यांनी उभे केलेले हे एकात्मिक मॉडेल आज संपूर्ण देशासाठी शाश्वत विकासाचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.
बांबू उद्योगाला आधुनिकतेची जोड देताना संजीव करपे यांनी ‘JANS’ बांबू प्रॉडक्ट्स आणि ‘Woodygrass’ सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय बांबू उत्पादनांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. भारत, मालदीव आणि इतर अनेक देशांमध्ये त्यांनी बांबूपासून उभारलेल्या इको-रिसॉर्ट्स आणि प्री-फॅब्रिकेटेड स्ट्रक्चर्सनी पर्यावरणपूरक बांधकामाची एक नवी दिशा दाखवून दिली आहे. विशेषतः कोकणातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्यासारख्या नगदी पिकापेक्षाही बांबू उत्पादनातून अधिक परतावा मिळवून देत त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यांच्या या कार्यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होतच आहे, शिवाय हरित अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळत आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक शासकीय सल्लागार समित्यांचे सदस्य म्हणून संजीव करपे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. बांबू क्षेत्रासाठी तांत्रिक मानके आणि धोरणात्मक दिशा ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करून शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करण्याच्या त्यांच्या धडपडीचा सन्मान म्हणून सह्याद्री शिक्षण संस्थेने त्यांना गौरविण्याचे निश्चित केले आहे. या पुरस्कारामुळे स्व. गोविंदरावजी निकम साहेबांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेणाऱ्या एका खऱ्या कर्मयोग्याचा सन्मान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा सावर्डे येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून, याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे.







