रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गालगत निवळी येथील रांबोळकरीन देवस्थानासमोरील विहिरीत उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महेंद्र गोविंद सनगरे (४०, रा. हातखंबा, सनगरेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
महेंद्र सनगरे हे सोमवार, १२ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मात्र काम संपल्यानंतर ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी दुसऱ्या दिवसापासून त्यांचा शोध सुरू केला. अखेर ते बेपत्ता झाल्याची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
दरम्यान, शोधमोहीम सुरू असतानाच १४ जानेवारी रोजी सकाळी निवळी येथील रांबोळकरीन देवस्थानासमोर असलेल्या विहिरीत महेंद्र सनगरे यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी त्यांची बॅग, चप्पल व मोबाईल फोनही सापडले.
घटनेची माहिती मिळताच हातखंबा पोलीस पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
रत्नागिरी : निवळी येथे विहिरीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या







