रत्नागिरी : जिल्ह्यातील नाणीज गणात राजकीय चुरस शिगेला पोहोचलेली असतानाच नाणिज येथील डॉ. पद्मजा कांबळे यांनी बाजी मारली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांच्या नावावर सहमती दर्शविल्याने तसेच कोणताही प्रबळ विरोध समोर न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे या गणात निवडणूक न लढवताच डॉ. कांबळे यांनी महत्त्वाचे यश संपादन केले आहे.
तालुक्यात इतर ठिकाणी एका-एका मतासाठी तीव्र संघर्ष पाहायला मिळणार असताना नाणीज गणात झालेली ही बिनविरोध निवड राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. डॉ. पद्मजा कांबळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत विविध पक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे. या निवडीमुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डॉ. कांबळे यांच्या या यशामुळे महायुतीला, आणि विशेषतः शिवसेनेला मोठे बळ मिळाले असून आगामी राजकीय घडामोडींमध्ये याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नाणीज गणात डॉ. पद्मजा कांबळे बिनविरोध; महायुतीसह शिवसेनेला मोठे बळ








