खेड : तालुक्यातील लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमधून पीएफएएस रसायनांचे उत्पादन तत्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी कंपनीच्या मुख्य गेटसमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व कोकण नागरी संघर्ष समितीचे अशोक जाधव वराजू आंब्रे यांनी केले. पीएफएएस रसायने पर्यावरणासाठी तसेच मानवी आरोग्यास अत्यंत घातक असून त्याचा थेट परिणाम पाणी, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या रसायनांचे उत्पादन तत्काळ थांबवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अशोक जाधव यांनी सांगितले की, पीएफएएससारखी घातक रसायने दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहतात. त्यामुळे भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ ठोस निर्णय घ्यावा. तर राजू आंब्रे यांनीही सर्व नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन केले. पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
लोटेत लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात बेमुदत धरणे आंदोलन





