राजापूर: कोकणच्या मातीतील सुगंधी आणि रसाळ हापूस आंब्याचे पुण्याच्या मार्केट यार्डात आगमन झाले असून, यंदाच्या हंगामाची दिमाखात सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथून शुक्रवारी हापूस आंब्याच्या पहिल्या चार पेट्यांची आवक झाली. या पहिल्याच आवकीला घाऊक बाजारात १५ हजार रुपये प्रति पेटी इतका विक्रमी दर मिळाला आहे. जैतापूरहून आलेल्या या प्रत्येक पेटीमध्ये ३ डझन आंबे होते, ज्याची खरेदी फळ बाजारातील प्रसिद्ध व्यापारी युवराज काची यांनी केली.
सध्या बाजारात हापूसची आवक अतिशय तुरळक असल्याने दरांमध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मात्र, ही केवळ सुरुवातीची टप्प्यातील आवक असून, १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर आवक सुरू होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. आवक वाढल्यानंतर दरांमध्ये स्थिरता येईल आणि सर्वसामान्य ग्राहकांनाही हापूसची चव चाखता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, यंदा हापूससोबतच केशर आंब्याचीही एक पेटी बाजारात दाखल झाली आहे.
या पहिल्या आवकीच्या वेळी बाजार समितीचे संचालक गणेश घुले, फळविभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे, दादासाहेब बांदल यांच्यासह अजय वाखरे, नाना मस्के, शरद कुंजीर यांसारख्या प्रमुख व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. यंदा आंब्याची गुणवत्ता अतिशय उत्तम असल्याचे तज्ज्ञांचे मत असून, सुरुवातीच्या या विक्रमी दरामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुढील काही आठवड्यांत बाजारात हापूसची उपलब्धता वाढणार असून, खवय्यांना आता खऱ्या अर्थाने आंब्यांच्या राजाच्या प्रतीक्षेचा अंत होणार आहे.






