दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवल्याचा ठपका
रत्नागिरी: दारूच्या नशेत मालवाहू ट्रक भरधाव वेगाने चालवून अपघात केल्याप्रकरणी एका चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास साळवी स्टॉप ते हातखंबा जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर घडली. मस्तान आयुबसाहब पटेल (वय ४८, रा. खोतवाडी, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मस्तान पटेल हा आपल्या ताब्यातील एसएमएल कंपनीचा सम्राट जीएस मॉडेलचा मालवाहतूक करणारा ट्रक (क्रमांक एमएच ४३ बीपी ४१५१) घेऊन साळवी स्टॉपकडून हातखंब्याच्या दिशेने जात होता. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते. दारूच्या नशेत असतानाही त्याने रस्त्याच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता भरधाव वेगाने आणि हयगयीने वाहन चालवले. साळवी स्टॉपजवळ रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी त्याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन कोसळले. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश भास्कर भुजबळराव (वय ५२) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सार्वजनिक रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहन चालवून स्वतःच्या व इतरांच्या जिवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
साळवी स्टॉप येथे अपघातप्रकरणी इचलकरंजीतील चालकावर गुन्हा







