मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीकडूनही जोरदार तयारी सुरु आहे, तर भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुतीच्या काही दिग्गज नेत्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपत असल्यामुळे, पक्षीय नेत्यांकडून स्थानिक व केंद्रस्तरीय राजकीय रणनीतीत गती वाढली आहे. भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर आणि धैर्यशील पाटील यांची नावं चर्चेत आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे, शायना एनसी आणि संजय निरूपम यांच्यावर विचार सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार असून, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातील 7 खासदारांचा कार्यकाळ संपत असल्याने शरद पवार, डॉ. भागवत कराड, फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि रामदास आठवले यांच्या जागांसाठी गटस्तरीय निर्णय घेण्यात येत आहेत. भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी फायनल झाल्यानंतर केंद्राकडून अंतिम मान्यता मिळेल, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या विधानसभेतील संख्यात्मक परिस्थिती पाहता, भाजपकडे 131 आणि 1 अपक्ष आमदार असून, एका खासदारासाठी ३७ मतांची आवश्यकता असल्यामुळे भाजपकडून 3 ते 4 खासदार राज्यसभेत निवडून येऊ शकतात. तर शिंदेच्या शिवसेनेकडे 58 आमदार असून, त्यांचा एकच खासदार राज्यसभेत निवडून येऊ शकतो. महायुतीकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे त्यांचे खासदार जास्त प्रमाणात राज्यसभेत निवडून जाण्याची शक्यता आहे. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, महायुतीच्या झोळीतून लढल्यास भाजपचे 3, शिंदे शिवसेनेचा 1 आणि राष्ट्रवादीचा 1 खासदार राज्यसभेत पोहचू शकतात, ज्यामुळे आगामी निवडणुकीत महाराष्ट्राचे राजकीय समीकरण बदलू शकते.






