संगमेश्वर: रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य वैभव असलेल्या हापूस आंब्याचा हंगाम आता खऱ्या अर्थाने गती घेऊ लागला असून, संगमेश्वर खाडीपट्ट्यातील यंदाच्या हंगामातील पहिली आंबा पेटी पुणे बाजारपेठेच्या दिशेने रवाना झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खाडीपट्ट्यातून पहिली पेटी पाठवण्याचा बहुमान परचुरी गावचे सुपुत्र आणि ‘व्हीआयपी आंबा शेतकरी’ म्हणून ओळखले जाणारे श्री. शरद गोणबरे व श्री. विपुल गोणबरे यांनी पटकावला आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करत गोणबरे बंधूंनी घेतलेल्या मेहनतीचे फळ या पहिल्या पेटीच्या रूपाने पाहायला मिळत असून, यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.ही पहिली आंबा पेटी ४ मार्च २०२६ रोजी पुणे येथील प्रसिद्ध व्यापारी लक्ष्मीनारायण यांच्याकडे विक्रीसाठी पाठवण्यात आली आहे.
कोकणातील हापूसला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असते आणि हंगामाच्या सुरुवातीला येणाऱ्या या पेटीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. संगमेश्वरच्या खाडीपट्ट्यातील हवामान आणि जमिनीचा पोत हा हापूससाठी अत्यंत पोषक असल्याने येथील आंबा चवीला आणि रंगाला अत्यंत उत्कृष्ट असतो. गोणबरे बंधूंनी आपल्या बागेची योग्य निगा राखून वेळेत उत्पादन घेतल्यामुळे त्यांना हा मान मिळाला आहे. या पहिल्या पेटीच्या रवानगीमुळे संगमेश्वर तालुक्यातील आंबा हंगामाला खऱ्या अर्थाने आणि अत्यंत उत्साहपूर्ण पद्धतीने सुरुवात झाली आहे. या यशाबद्दल गोणबरे बंधूंचे आंबा बागायतदार, ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाकडून सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात आंबा उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.







