GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने केला पुण्यात तब्बल १८१ किलो अंमली पदार्थांचा नष्ट

Gramin Varta
35 Views

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून एक मोठी बातमी समोर आली असून, गेल्या पाच वर्षांत विविध कारवाईत जप्त केलेला तब्बल १८१ किलो अंमली पदार्थांचा साठा पुणे येथे नष्ट करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल नष्ट करण्याची धडक मोहीम राबवली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘ड्रग्ज डिस्पोजल समिती’ची स्थापना करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, तसेच सदस्य अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके यांच्या देखरेखीखाली ही प्रक्रिया पार पडली.

सन २०२० ते २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये ६५ गुन्हे दाखल झाले होते. या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची रीतसर परवानगी मिळाल्यानंतर हा मुद्देमाल नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व त्यांच्या पथकाने अंमलबजावणी केली.
या कारवाईत एकूण १८१ किलो १४१ ग्रॅम अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. यामध्ये ८२ किलो ९८१ ग्रॅम गांजा, ९७ किलो ८९९ ग्रॅम चरस, २५२ ग्रॅम ३० मिलिग्रॅम ब्राऊन हेरॉइन आणि ९ ग्रॅम एम.डी. ड्रगचा समावेश होता. हा सर्व मुद्देमाल सुरक्षितरित्या पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एम.आय.डी.सी. येथे नेण्यात आला. तिथे महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड या प्रकल्पात २६ डिसेंबर २०२५ रोजी इन्सीनिरेशन (जाळण्याच्या) पद्धतीने हा साठा विल्हेवाट लावून यशस्वीरित्या नष्ट करण्यात आला.

Total Visitor Counter

3072146
Share This Article