मानसकोंड-कानरकोंड ग्रामपंचायतीचे उद्घाटनप्रसंगी गौरवोद्गार
लाडकी बहीण योजनेत पैसे वाढतील मात्र योजना बंद पडणार नाही : डॉ. उदय सामंत
संगमेश्वर : मानसकोंड, कानरकोंड आणि आंबेड या तीन गावांनी दाखवलेली एकजूट ही केवळ कौतुकाची बाब नसून ग्रामीण विकासासाठी आदर्श ठरणारी ठरली आहे. या तिन्ही गावांच्या एकीमुळे अवघ्या सहा महिन्यांत ग्रामपंचायतीचा प्रस्ताव मंजूर होऊन नूतन कार्यालय उभे राहिले. या ग्रामपंचायतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत यांनी गावकऱ्यांच्या एकजुटीचे विशेष कौतुक केले.कामाच्या ठिकाणी राजकारण न आणता विकासासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. असेही त्यांनी म्हटले.
मानसकोंड–कानरकोंड–आंबेड गावांनी ही गोष्ट कृतीतून सिद्ध करून दाखवली,असे सांगताना सामंत यांनी ही ताकद कोणत्याही नेत्याची नसून जनतेच्या विश्वासाची असल्याचे स्पष्ट केले. आंबेड गावाने दाखवलेला पाठिंबा आणि तिन्ही गावांतील सलोखा यामुळेच ग्रामपंचायतीचे स्वप्न साकार झाले, अन्यथा ते केवळ स्वप्नच राहिले असते, असेही त्यांनी नमूद केले.
मानसकोंड – कानरकोंड ग्रामपंचायत उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी सूचक इशारा देत म्हटले की, तीन गावांमध्ये जशी एकी टिकली आहे, तशीच पुढेही कायम राहिली तर विकासकामांची गतीही अबाधित राहील. यावेळी ग्रामपंचायत इमारतीसाठी २० लाख रुपयांचा निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली. नेते असलो तरी आमची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे, असे सांगत त्यांनी स्थानिक विकासासाठी कटिबद्धता व्यक्त केली.
दरम्यान, राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लाडक्या भावाचा शब्द आहे, योजनेतील आर्थिक लाभ वाढवला जाईल; मात्र योजना बंद होणार नाही.” असे महिलाना आश्र्वासित केले.
तत्पूर्वी पालकमंत्री उदय सामंत आणि पदाधिकाऱ्यांचे कार्यक्रमस्थळी वाजत गाजत स्वागत करण्यात आले. कानरकोंड मानसकोंड ग्रामपंचायतीचे फित कापून सामंत यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमात अनेक मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात बोलताना उद्योजक शंकर माटे म्हणाले, उदय सामंत यांच्या पाठीशी सर्वांनी राहिले पाहिजे. आज आपल्या ग्रामपंचायतीच स्वप्न त्यांच्यामुळे पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांना साथ देण्यासाठी आई अंतराळदेवीची शपथ सर्वांनी घेऊया अशी प्रार्थना केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुनील शिगवण यांनी नवीन ग्रामपंचायत निर्मितीचा प्रवास कथन केला. तसेच नवीन ग्रामपंचायत इमारत मानसकोंड – कानरकोंड रस्ता या प्रमुख मागण्या सामंत यांच्यासमोर ठेवल्या.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, पंचायत समिती सभापती शर्वरी वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत, बाबू म्हाप, देवरुखचे तहसीलदार साबळे, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यादव, पंचायत समितीचे सदस्य सुहास मायंगडे, नवी मुंबईचे माजी नगरसेवक दानशूर व्यक्तिमत्व शंकर शेठ माटे, आंबेडचे माजी उपसरपंच शोएब भाटकर, तंटामुक्ती अध्यक्ष अनिरुद्ध मोहिते, माजी सरपंच दिनेश गुरव, सौ नूतन शिगवण, पोलीस पाटील सुनील शिगवण, पोलीस पाटील विकास फेपडे, प्रशासक निकम, ग्रामविकास अधिकारी संजीवनी गवंडी, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव किंजळे, मानसकोडचे खोत रवी काका मुळे, गावकर सुभाष कानर, संदीप पाचकुडवे, मानकरी जनार्दन सुर्वे, फेपडेवाडीचे गावकर सुमंत फेपडे, कारभारी गणूजी फेपडे, संजय काका मुळे, शाखाप्रमुख दत्ताराम कानर, शाखाप्रमुख काशिनाथ फेपडे, मुंबई मंडळ कानरकोडचे अध्यक्ष किशोर कानर, फेपडेवाडी मुंबईचे अध्यक्ष विश्वनाथ फेपडे, प्रकाश खापरे, नितीन बेंडखळे, शशिकांत पांचाळ, सुहास किंजळे, सुरेश किंजळे, संचिता पाचकले, शिक्षक नथुराम पाचकले, रमेश खापरे, सुनील खापरे, सिताराम कानर, सुरेश कानर, संदीप शिगवण, चंद्रशेखर कानर, तुकाराम वरक, ममता कानर, शालिनी वरक, शांताराम माटे, मंगेश शिगवण, स्थानिक व मुंबई ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक विलास कानर यांनी आपल्या उत्कृष्ट शैलीतून केले. तर आभार नथुराम पाचकले यांनी मानले.
तीन गावांची एकी ठरली विकासाची ताकद : पालकमंत्री उदय सामंत




