नवी मुंबई:कोकणात मान्सूनचे आगमन जवळ येत असताना कोकणरेल्वे महामंडळाने (केआरसीएल) रेल्वे सुरक्षेसाठी विशेष खबरदारी सुरू केली आहे.अतिसंवेदनशील रेल्वे मार्गांवर रात्रगस्त वाढविण्यासह धोकादायक ठिकाणी २४ तास वॉचमन तैनात केले आहेत.
या पार्श्वभूमीवर केआरसीएलच्या सुरक्षा विभागातर्फे ३ जूनला रत्नागिरी येथे ‘मान्सून पेट्रोलिंग’ विषयावर सुरक्षा परिसंवाद आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
प्रत्येक गस्त कर्मचाऱ्याला सुमारे पाच किलोमीटरचा रेल्वे मार्ग सोपविला जातो. शेजारच्या गस्त पथकाशी ‘पेट्रोल डायरी’ची देवाणघेवाण करून संबंधित मार्ग सुरक्षित असल्याची खात्री केली जाते. परिसंवादात या डायरी देवाणघेवाणीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.







