रत्नागिरी: साप आणि मानवामधील संघर्ष कमी होऊन आता ते सहजीवनाकडे वळले पाहिजेत, असा महत्त्वपूर्ण संदेश देणारे रत्नागिरीतील प्रसिद्ध सर्पमित्र रोहन वारेकर यांची विशेष मुलाखत आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारित होणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून सर्पमित्र म्हणून अविरत कार्य करणाऱ्या वारेकर यांनी ‘इंद्रधनुष्य’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभाग घेऊन सापांच्या विविध जाती, सर्पदंश, त्याबाबतचे समाजात असलेले गैरसमज आणि वनविभागाची हेल्पलाईन यावर सखोल मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे, जागतिक स्तरावर किंग कोब्रा या विषयावर आपले शोधपत्र सादर करणाऱ्या वारेकर यांनी या मुलाखतीदरम्यान आपले थरारक अनुभवही श्रोत्यांसमोर उलगडले आहेत.
साप हा निसर्गातील अन्नसाखळीचा एक अविभाज्य आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मानवी वस्तीत सापांचा वावर वाढल्याने होणारा संघर्ष टाळून निसर्ग संवर्धनासाठी ‘जगा आणि जगू द्या’ ही भूमिका किती महत्त्वाची आहे, याचा संपूर्ण प्रवास या मुलाखतीतून ऐकायला मिळणार आहे. ही मुलाखत येत्या शनिवारी, ७ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित केली जाणार आहे. या कार्यक्रमात सोनाली सावंत यांनी वारेकर यांच्याशी संवाद साधला असून, कार्यक्रमाचे सादरीकरण विवेक वानखडे यांनी केले आहे. ही मुलाखत ११४३ कि.ह. मध्यमलहरी वाहिनीवर तसेच १०१.५ मे.ह. एफ.एम. वाहिनीवर उपलब्ध असणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रबोधनपर मुलाखतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






