मंडणगड: तालुक्यातील दंडनगरी येथील सुनील गोविंद काप (वय ४४) या तरुणाचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांना चौथ्यांदा हृदयविकाराचा झटका आल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुनील काप यांना यापूर्वी तीन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला होता. ८ मार्च २०२६ रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांची पत्नी आणि चुलत भाऊ पांडुरंग काप यांनी त्यांना तात्काळ खासगी वाहनाने उपचारासाठी मुंबईला हलवले. पहाटे पावणेपाचच्या सुमारास त्यांना मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच पहाटे साडेपाच वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेची नोंद सुरुवातीला मुंबईतील जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने करण्यात आली होती. त्यानंतर सदर प्रकरणाची कागदपत्रे मंडणगड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली असून, ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने दंडनगरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






