लांजा/ मकबूल मुकादम:एकीकडे बदलत्या हवामानामुळे आंबा पीक आधीच संकटात सापडले असताना, आता वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे बागायतदार हतबल झाले आहेत. बेनी बुद्रुक येथील बागायतदार दीपक सुर्वे यांच्या हापूस आंब्याच्या बागेत गुरुवारी रात्री गवा रेड्यांनी शिरून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. या घटनेमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री गवा रेड्यांच्या कळपाने दीपक सुर्वे यांच्या बागेवर हल्ला चढवला.
यावेळी या प्राण्यांनी झाडांचे आणि तयार होत असलेल्या फळांचे प्रचंड नुकसान केले आहे. यंदा वारंवार बदलणारे वातावरण आणि अवकाळी संकटामुळे आंबा बागायतदार आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत आता गवा रेड्यांनी धुमाकूळ घातल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.वन्यप्राण्यांच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती करणे कठीण झाले असून, बेनी बुद्रुक येथील दीपक सुर्वे यांच्या बागेत झालेल्या या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. बागायतदाराला झालेल्या या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी शासनाने आणि वन विभागाने तत्काळ लक्ष देऊन योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी आर्त हाक आता स्थानिक शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.







