लांजा:तालुक्यातील तेलीवाडी येथील एका ७५ वर्षीय मतिमंद वृद्धाचा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अन्वर इब्राहिम खतीब असे मयत वृद्धाचे नाव असून, कोर्ले फाट्याजवळ जखमी अवस्थेत सापडल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अन्वर खतीब हे जन्मापासून मतिमंद होते. १० मार्च २०२६ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास ते कोर्ले फाट्याच्या पुढे सार्दळ यांच्या दुकानाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी जखमी अवस्थेत पडलेले स्थानिकांना मिळून आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि कानातून रक्त येत होते.
घटनेची माहिती मिळताच त्यांचे भाऊ बशीर अली इब्राहिम खतीब यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय लांजा येथे धाव घेतली. मात्र, अन्वर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने आणि ते बेशुद्ध असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर १०८ रुग्णवाहिकेने अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलवण्यात आले.रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयातील आय.सी.यू विभागात त्यांच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने १२ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत बशीर खतीब यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी १३ मार्च रोजी रात्री २:०० वाजता बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे ए.एम.आर. क्रमांक १३/२०२६ नुसार नोंद केली आहे. सदर वृद्धाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला किंवा ते त्या ठिकाणी कसे पडले, याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.







