सिकंदर फरास / दाभोळे: पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने जिल्ह्यात आपली पकड अधिक मजबूत केली आहे.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने ५६ पैकी ४१ जागांवर विजय मिळवत मोठी घोडदौड केली होती.या विजयानंतर आज पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेच्या महत्त्वपूर्ण पदांची घोषणा केली.महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदासाठी अस्मिता केंद्रे यांची निवड करण्यात आली आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या मतदारसंघातील भिंगळोली येथून त्या विजयी झाल्या आहेत.अस्मिता केंद्रे या एक अनुभवी लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी उत्तम कामगिरी केली होती.त्यांच्या याच अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील विकासकामांना व्हावा,या उद्देशाने त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची निवड झाली आहे.चाळके हे पालकमंत्री उदय सामंत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याने,जिल्हा परिषदेचा कारभार गतीने चालवण्यासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की,हे अध्यक्षपद सव्वा वर्षाच्या कालावधी साठी असेल.या कार्यकाळात प्रामुख्याने ग्रामीण भागातील रस्ते,पाणी, आरोग्य सुविधा या सोडवण्यासाठी भर दिला जाईल. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यात विकासकामांना नवी गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






