GRAMIN SEARCH BANNER

राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरणार

Gramin Varta
25 Views

मुंबई : मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. गेल्या चार दिवसांच्या तुलनेत बुधवारी काही भागात पावसाचा जोर कमी झाला. दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

काही भागात अधूनमधून हलक्या सरी ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही भागात जनजीवन विस्कळित झाले. राज्यातील बहुतांश भागात मात्र, बुधवारी पावसाचा जोर कमी होता. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळला. मात्र, मुंबई, ठाणे परिसरात बुधवारी पाऊस ओसरला होता. दरम्यान, संपूर्ण राज्यात गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

त्यानुसार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसतील. प्रामुख्याने कोकणात अधूनमधून मुसळधार पाऊस पडेल. मात्र, इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता नाही. मुंबई शहर तसेच उपनगरात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस पडला, पहाटेही पावसाचा जोर कायम होता. सकाळी ११ नंतर पावसाने विश्रांती घेतली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ०.४ मिमी, तर सांताक्रूझ येथे ९.८ मिमी पावसाची नोंद झाली.

राज्यात बुधवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत झालेला पाऊस

पुणे – १.८ मिमी

माथेरान – २९.४ मिमी

नाशिक – २२.२ मिमी

कोल्हापूर – ४.३ मिमी

धाराशिव – ४.२ मिमी

डहाणू – २७.२ मिमी

रत्नागिरी – ७.३ मिमी

मालेगाव – १९.३ मिमी

पावसाचा अंदाज कुठे

मुसळधार पाऊस – मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड

हलक्या सरी – सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली,परभणी, बीड, हिंगोली, नांदेड यवतमाळ, चंद्रपूर, लातूर

Total Visitor Counter

3379882
Share This Article