रत्नागिरी: तालुक्यातील निवळी बौद्धवाडी येथे ग्रामस्थांच्या जाण्या-येण्याचा सार्वजनिक रस्ता दगडी चिरे रचून अडविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरवेल ते समाजमंदिर या मार्गावर चिऱ्यांची भिंत रचून अडथळा निर्माण केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हा रस्ता मोकळा करून दिला आहे.
निवळी बौद्धवाडी येथील रहिवासी जितेंद्र जयवंत सावंत (वय ३३) यांनी याप्रकरणी तक्रार दिली असून, १६ मार्च २०२६ रोजी पहाटे अडीच वाजण्यापूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने निवळकर यांच्या कंपाऊंडला लागून असलेल्या मुख्य रस्त्यावर दगडी चिरे लावून रस्ता पूर्णपणे बंद केला होता. सार्वजनिक उपयोगाचा रस्ता अशा प्रकारे अडविल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच १९ मार्च रोजी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचांसमक्ष पाहणी केली आणि रस्त्यावरील अडथळे दूर करून मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत केला.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२) आणि गुन्हा रजिस्टर नंबर ४३/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीचा शोध रत्नागिरी ग्रामीण पोलीस घेत आहेत.
निवळी बौद्धवाडीतील सार्वजनिक रस्ता दगडी चिरे रचून अडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा




