रत्नागिरी: रत्नागिरीकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार असून, बहुप्रतिक्षित विमानसेवा प्रत्यक्षात येण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. रत्नागिरी विमानतळावरील भव्य टर्मिनल इमारतीचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, मे २०२६ मध्ये येथून पहिले विमान उड्डाण करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुमारे २५ एकर विस्तीर्ण क्षेत्रात ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाची ही आधुनिक इमारत उभारली जात असून, सद्यस्थितीत इमारतीच्या सीलिंगचे ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. भिंतींचे बांधकाम वेगाने सुरू असून लवकरच इमारतीच्या रंगरंगोटीला प्रारंभ होणार आहे. हे महत्त्वाकांक्षी काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सुमारे २०० कामगार आणि २० अभियंते अहोरात्र मेहनत घेत आहेत.
प्रकल्पाची गुणवत्ता आणि वेग राखण्यासाठी कामाचे नियोजनबद्ध विभाजन विविध कंपन्यांमध्ये करण्यात आले आहे. मुख्य इमारतीचे काम न्याती कंपनीमार्फत केले जात असून, अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामाची जबाबदारी एस. एस. पाटील कंपनीकडे सोपवण्यात आली आहे. सध्या या परिसरात रस्त्यांच्या सपाटीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, त्यानंतर लगेचच डांबरीकरण केले जाणार आहे. तसेच, संपूर्ण विमानतळ परिसरातील प्रकाशयोजना आणि विद्युतविषयक कामांची जबाबदारी सोनी इलेक्ट्रिक कंपनी पार पाडत आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विशेष पाठपुरावा केला असून, राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीमुळे या कामाला मोठी गती मिळाली आहे. प्रशासकीय नियोजनानुसार, एप्रिल अखेरपर्यंत सर्व तांत्रिक बाबी आणि बांधकामाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मे महिन्यापासून विमानसेवा सुरू झाल्यास जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासह स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. विमानतळाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने रत्नागिरीतील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.




