रत्नागिरी: तालुक्यातील जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सांडेलावगण येथे एका ३३ वर्षीय परप्रांतीय मजुराने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश राधेश्याम (मूळ राहणार श्रीनगर, लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश) असे मृत मजुराचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, मृत महेश हा गेल्या चार महिन्यांपासून समीर रोहिदास रहाटे यांच्याकडे आंबा बागेत मजुरीचे काम करत होता. गेल्या दोन-चार दिवसांपासून तो प्रमाणाबाहेर मद्यपान करत असल्याचे सांगण्यात येत आहे. कचरे येथील एकनाथ हळदणकर यांची बाग समीर रहाटे यांनी कराराने घेतली असून, तेथे राखणदारी करण्यासाठी महेश गेला होता. मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास मालकाने त्याला वारंवार फोन केला, मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. शंका आल्याने समीर रहाटे स्वतः बागेत पाहायला गेले असता, महेशने आंब्याच्या झाडाला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
त्याला तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे नेण्यात आले, परंतु तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ११/२०२६, बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.






