चिपळूण: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाका येथे २५ मार्च रोजी पत्रकारांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. चिपळूणसारख्या सुसंस्कृत आणि शांतताप्रिय शहरात पत्रकारांसारख्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा प्रकारे हल्ला होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि अशोभनीय बाब असल्याची भावना पक्षाचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन (आबू) चंद्रकांत ठसाळे यांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ठसाळे यांनी नमूद केले आहे की, संबंधित घटनेबाबत आधीच गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपातीपणे चौकशी होणे गरजेचे आहे. समाजात कायदा व सुव्यवस्थेचा धाक निर्माण होण्यासाठी या हल्ल्यातील सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भविष्यात चिपळूणमध्ये पत्रकार किंवा कोणत्याही घटकावर असा भ्याड हल्ला करण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही, अशा प्रकारचा धडा प्रशासनाने घालून द्यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनावर तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांच्यासह शौकतभाई मुकादम, जयद्रथ खताते, दशरथ दाभोळकर, योगेश पवार, मनोज जाधव, सचिन साडविलकर, मिलींद कापडी, रघुनाथ भालेकर, विनायक पाटेकर आणि राजु सुतार उपस्थित होते.







