खेड (प्रतिनिधी): लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि जनक जन आक्रोश समितीच्या प्रतिनिधींनी मुंबईत मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेत, कोकणच्या निसर्ग रक्षणासाठी मनसे या लढ्यात पूर्ण ताकदीनिशी सोबत असल्याचे आश्वासन दिले.
लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीकडून उत्पादित होणाऱ्या ‘पी फास’ सारख्या घातक रसायनांमुळे कोकणचा निसर्ग आणि मानवी जीवनाला मोठा धोका निर्माण झाला आहे. हा लढा जनहितार्थ असून, घातक रसायन निर्मिती थांबवण्यासाठी मनसेने पाठिंबा द्यावा, अशी विनंती निवेदनाद्वारे या प्रतिनिधी मंडळाने राज ठाकरे यांना केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी जिथे जिथे गरज लागेल तिथे मनसे आंदोलकांच्या पाठीशी उभी राहील, असा शब्द दिला. तसेच मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही या लढ्यात संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.
या भेटीदरम्यान मनसेचे दक्षिण मुंबई संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, मनसे शेतकरी सेना खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके यांच्यासह लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या पाठिंब्यामुळे लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील आंदोलनाला मोठी शक्ती मिळाली असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.






