रत्नागिरी: ७३ व्या प्रौढ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२६ मध्ये रत्नागिरीच्या महिला संघाने आपली विजयी घोडदौड कायम राखत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात रत्नागिरीने पालघर जिल्ह्याच्या संघाचा ३५-३१ अशा गुणफरकाने पराभव करत स्पर्धेत आपले स्थान अधिक भक्कम केले. या विजयामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले असून महिला संघाच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्पर्धेतील साखळी फेरीत ‘ड’ गटातून गट विजेता ठरण्याचा बहुमान रत्नागिरी महिला संघाने आधीच पटकावला होता. त्यानंतर झालेल्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात पालघरविरुद्ध खेळाडूंनी मैदानावर उत्कृष्ट ताळमेळ आणि चपळाईचे दर्शन घडवले. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली, मात्र मोक्याच्या क्षणी चढाई आणि पकडीचा अचूक खेळ करत रत्नागिरीने ४ गुणांच्या फरकाने विजय खेचून आणला. आता या दिमाखदार विजयानंतर रत्नागिरीचा संघ उपांत्य फेरीच्या (सेमी फायनल) लढतीसाठी सज्ज झाला असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या महत्त्वाच्या सामन्याकडे लागले आहे.







