नागोठणे: पोलीस ठाणे हद्दीत भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ संतोष आग्रे (वय २६, रा. तानाजी नगर, कुरार व्हिलेज, मालाड पूर्व; मूळ रा. मालगुंड, जि. रत्नागिरी) हे आपल्या ताब्यातील मोटारसायकलवरून मालाड ते मालगुंड असा प्रवास करत होते. दरम्यान, नागोठणे चिकणी गावाच्या हद्दीत रेल्वे पुलापासून सुमारे ५० मीटर अंतरावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात सौरभ आग्रे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७१/२०२६ नोंदविण्यात आला असून मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १३४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार पाटील करीत असून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.






