दापोली: तालुक्यातील हर्णे येथील समुद्रकिनाऱ्यालगत एका खलाशाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संदीप महादेव पादणे (वय ४५, रा. पंचनदी, ता. दापोली) असे मृत खलाशाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप पादणे हे बोटीवर खलाशी म्हणून कार्यरत होते. ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते बोटीवरून कोणालाही काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. याप्रकरणी बोट मालक राजेंद्र महादेव पावसे यांनी दापोली पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
त्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना ७ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हर्णे येथील गोवा किल्ल्याच्या किनाऱ्यालगत समुद्रामध्ये त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ बाहेर काढून दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे हर्णे बंदर परिसरात आणि खलाशांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







